Tuesday, July 12, 2011

'प्रवाह'

माणसांच्या गर्दीत काल
मी एक विचित्र गोष्ट पाहिली,
डोक्यावरची शिंगे अभिमानाने
मिरवत जाताना ती कुत्सित
हसत होती !
कोण्या एकाच्या मागावरची ती माणसे,
अन कोणी तो 'एकला'
काळाची अजब स्पर्धा लागली होती !
पायात बेड्या घातल्यागत जणू
'तो' जडपणे चालला होता ,
अनभिषिक्त समजल्या जाणाऱ्या
प्रवाहाचा 'तो' काळ होता .
पायाला काटे रुतत होते ,
अविश्वासाचे सुरे पाठीत
खुपसले जात होते ,
'माणूस' म्हणवल्या जाणाऱ्या
पाषाणातून तो चालला होता,
प्रवाह त्याला खेचत होता ,
तो हेंदकाळत त्याला
विरोध करत होता ,
शेवटी .. शेवटी एका पर्वताच्या
कड्याखालून त्याची आर्त
किंकाळी ऐकू आली .

नद्यांनी किती प्रवाह बदलले
वाऱ्याने दशदिशा घुसळल्या
पण आपल्या अस्मिता
आपल्यातच अव्यक्त राहिल्या !!

शतकानु-शतके प्रवाहाच्या विरोधात
जाण्यासाठी त्यांचा जन्म होतो,
आपण मात्र त्यांचे
पुतळे उभे करतो ,
दुरून दंडवत घालण्यासाठी !


-रश्मी

1 comment: